धाराशिव – भारतीय जनता पक्ष हा लाखो कार्यकर्त्यांच्या त्याग, निष्ठा आणि परिश्रमातून उभा राहिलेला परिवार असून पक्षाची एकजूट, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि पक्षहित हीच माझी सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे स्पष्ट करत जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी फेसबुकवर खुलासा करत दिलगिरी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपमधील जुन्या-नव्या पदाधिकाऱ्यांच्या योगदानाबाबत करण्यात आलेल्या एका पोस्टनंतर पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती.

याबाबत खुलासा करत अर्चना पाटील यांनी सांगितले की, त्या सध्या मुलाच्या पदवीदान समारंभासाठी परदेशात असून वेळेतील फरकामुळे त्यांच्या सोशल मीडिया टीमने पूर्वपरवानगी न घेता अधिकृत स्टेटसवर संबंधित मजकूर प्रसिद्ध केला. त्या मजकुरामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल त्यांनी मनापासून दिलगिरी व्यक्त केली आहे. धाराशिव जिल्ह्यात पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अभूतपूर्व यश मिळवले असून ही एकजूट कायम ठेवणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले. काही घटकांकडून पक्षात मतभेद निर्माण करण्याचे प्रयत्न होत असले तरी पक्षहिताला धक्का लागू देणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामागे सोशल मीडिया टीमची चूक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले, तरी संबंधित मजकूर अधिकृत स्टेटसवर कसा प्रसिद्ध झाला, याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.










