धाराशिव – धाराशिव नगरपालिकेतील नगरसेवकांच्या पक्षांतराच्या चर्चेने राजकीय वातावरण तापले असतानाच ठाकरे गटाने या घडामोडींवर आक्रमक भूमिका घेतली आहे. “सध्या सुरू असलेल्या नगरसेवकांच्या पळवापळवीशी ठाकरे गटाचा कसलाही संबंध नाही. जे ठाकरे परिवाराशी एकनिष्ठ आहेत, त्यांना सोबत घेऊन आम्ही संघर्ष करू,” असा स्पष्ट इशारा ठाकरे सेनेचे धाराशिव जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी दिला आहे.
दरम्यान, धाराशिव नगरपालिकेतील ठाकरे गटाच्या सात नगरसेवकांपैकी तब्बल पाच नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून जोर धरला होता. नगरसेवकांच्या संभाव्य पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याची राजकीय चर्चा रंगली होती.मात्र, ऐनवेळी या कथित पक्षप्रवेशाला ब्रेक लागल्याने आता राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे. भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेत असलेले नगरसेवक पुन्हा ठाकरे गटासोबत राहणार का, की पुढील काही दिवसांत पुन्हा राजकीय हालचालींना वेग येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकीकडे नगरसेवकांच्या पळवापळवीवरून भाजप आणि ठाकरे गटात राजकीय रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र असताना, “निष्ठावंतांना सोबत घेऊन संघर्ष करू,” या तानाजी जाधवर यांच्या वक्तव्यामुळे धाराशिवच्या राजकारणात ठाकरे गटाने थेट संघर्षाची भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.आता नगरसेवकांची निष्ठा कुणाकडे कायम राहणार आणि धाराशिव नगरपालिकेतील राजकीय गणित नेमके कुठल्या दिशेने जाणार, याची उत्सुकता वाढली आहे.











