ठाकरे सेनेचे भाजपमध्ये जाणारे पाच नगरसेवक ऐनवेळी शिंदेंच्या शिवसेनेत; धाराशिवच्या राजकारणात मोठा ट्विस्ट
धाराशिव – धाराशिवच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलटफेराची चर्चा रंगली आहे. ठाकरे सेनेचे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असलेले चार नगरसेवक ऐनवेळी शिंदेंच्या शिवसेनेत वळल्याने भाजपला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय खेळीमुळे हा सगळा डाव फिरल्याचे बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वी कळंबमधील नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. त्यानंतर धाराशिव येथील ठाकरे सेनेच्या नगरसेवकांचाही भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या संभाव्य पक्षप्रवेशासाठी भाजपकडूनही जोरदार फिल्डिंग लावण्यात आल्याचे सांगितले जात होते.
मात्र, ऐनवेळी ओमराजेंनी राजकीय डाव टाकला आणि भाजपच्या वाटेवर असलेल्या चार नगरसेवकांना शिंदेंच्या शिवसेनेच्या गोटात आणल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपच्या राजकीय तयारीवर पाणी फेरले गेल्याचे चित्र आहे.
भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी या नगरसेवकांना भाजपमध्ये आणण्यासाठी मोठे डावपेच आखल्याची चर्चा होती. त्या दिशेने यंत्रणादेखील कामाला लावत हे चार नगरसेवक आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या मात्र, ओमराजेंच्या खेळीने हे डावपेच ऐनवेळी उधळून लावत पाच नगरसेवकांना आपल्याकडे वळवून घेतले.
एकीकडे कळंबनंतर धाराशिवमध्येही भाजप आपली ताकद वाढवणार अशी चर्चा असतानाच चार नगरसेवक भाजपच्या हातातून निसटल्याने पाटील पिता-पुत्रांना हा राजकीय धक्का मानला जात आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात धाराशिव जिल्ह्यातील राजकारणात आणखीन वेगाने घडामोडी घडणार असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यामध्ये सुरू आहे











