धाराशिव – भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आज धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र या दौऱ्यातील राजकीय समीकरणाने सध्या धाराशिवच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंबचे नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार, पण प्रवेश सोहळा मात्र सोलापूर जिल्ह्यात! त्यामुळे या प्रवेशामागचं नेमकं राजकारण काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
रविंद्र चव्हाण यांचा धाराशिव जिल्ह्यातील दौरा खासगी असल्याचं सांगितलं जात असलं, तरी सोलापूर जिल्ह्यातील दौऱ्यात कळंब तालुक्यातील काही लोकप्रतिनिधींचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
गेल्या काही दिवसांपासून धाराशिव भाजपमधील अंतर्गत कलह चांगलाच चर्चेत होता. वरकरणी हा संघर्ष थांबलेला दिसत असला, तरी अंतर्गत धुसफूस अजूनही कायम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आता याच पार्श्वभूमीवर रविंद्र चव्हाण यांच्या कानावर जिल्ह्यातील राजकीय घडामोडी पुन्हा घातल्या जाणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, पक्षातील नव्या गटाकडून “आम्ही पक्ष वाढवत आहोत” हे नेतृत्वाला दाखवण्यासाठी कळंब तालुक्यातील काही लोकप्रतिनिधींना भाजपमध्ये आणण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र या प्रवेशामागे मोठी डील झाल्याचीही चर्चा कळंब तालुक्यात रंगली आहे. या चर्चांना अधिकृत दुजोरा मात्र मिळालेला नाही.
विशेष म्हणजे, कळंब तालुक्यातील हे लोकप्रतिनिधी यापूर्वी शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. धनुष्य हाती घेण्याआधीच आता कमळाचा मार्ग का स्वीकारला? असा सवालही उपस्थित होत आहे. ‘काम’ मिळण्याची शाश्वती आणि आता थेट भाजप प्रवेश, यामागे नेमकी कोणती राजकीय समीकरणं आहेत, याची चर्चा सुरू आहे.
याच प्रवेशावरून कळंब तालुक्यात ‘लक्ष्मीदर्शनाच्या’ चर्चेलाही उधाण आलं आहे. मात्र या सर्व चर्चांमध्ये तथ्य किती आणि राजकीय अफवा किती, हे प्रवेश सोहळ्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
एकीकडे भाजपमधील अंतर्गत शीतयुद्धाची चर्चा, दुसरीकडे निवडणुका जवळ नसतानाही होणारे राजकीय प्रवेश आणि त्यातही कळंबचे नगरसेवक, पण प्रवेश सोलापुरात. या संपूर्ण घडामोडीचं लॉजिक सामान्य मतदाराला कितपत पटणार, हा मोठा प्रश्न आहे.
कळंब तालुक्यात शिवसेनेला मानणारा मोठा मतदारवर्ग आहे. अशा परिस्थितीत राजकीय भूमिका बदलत असतील आणि त्यामागे केवळ वैयक्तिक राजकीय लाभाचं गणित असेल, तर आगामी काळात याचा जनतेतून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नगरसेवक कळंबचे… प्रवेश सोलापुरात!
पक्षविस्तार की राजकीय ‘डील’?
धनुष्याआधी कमळ का?
आणि या प्रवेशामागचं खरं ‘लॉजिक’ काय?
या प्रश्नांची उत्तरं आता भाजपच्या प्रवेश सोहळ्यानंतरच स्पष्ट होणार आहेत.











