धाराशिव भाजपमधील अंतर्गत कलह पुन्हा चर्चेत
धाराशिव – धाराशिव-लातूर-बीड स्थानिक प्राधिकरण विधान परिषद निवडणुकीत विजयी झालेले भाजप आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेमुळे धाराशिवमधील भाजपच्या अंतर्गत राजकारणाला पुन्हा एकदा उधाण आले आहे.
भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व्यंकट गुंड पाटील यांच्या पुढाकारातून 2 ऑगस्ट रोजी या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या निमंत्रण पत्रिकेत भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांची नावे नसल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.
धाराशिवमध्ये भाजपमधील अंतर्गत कलह आणखी तीव्र होत असल्याचे चित्र या निमंत्रण पत्रिकेतून दिसून येत असल्याची चर्चा सुरू आहे. यापूर्वीही मागील आठवड्यात राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या धाराशिव दौऱ्यादरम्यान भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी अनिल काळे यांना भेटू न दिल्याचा आरोप झाला होता. त्या घटनेनंतर भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली असून, धाराशिवच्या राजकीय वर्तुळात त्याची मोठी चर्चा रंगली होती.

आता बसवराज पाटील यांच्या सत्कार सोहळ्याच्या पत्रिकेतून आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांची नावे वगळण्यात आल्याने भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे. कालच भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी फेसबुक वर पोस्ट करत “मतभेद असू शकतात पण ते संघटनेच्या योग्य व्यासपीठावरच मांडावेत. प्रसारमाध्यमातून किंवा सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करणे टाळावे संघटनेची शिस्त पक्षाची प्रतिमा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. शिस्तीतूनच मजबूत संघटना आणि सक्षम नेतृत्व घडते.” अशी भूमिका घेतली होती.










