धाराशिव – जिल्ह्यात खतसाठा उपलब्ध असल्याचे अधिकृत पत्रकात नमूद असतानाही प्रत्यक्षात शेतकऱ्यांना खत मिळत नसल्याच्या आरोपावरून शेतकरी पुत्र मनोज जाधव यांनी जिल्हा कृषी विकास अधिकारी (जिल्हा परिषद) व जिल्हा कृषी अधीक्षक (सेंट्रल बिल्डिंग) यांच्या कार्यालयात अनोखे आंदोलन छेडले. दोन्ही अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्च्यांवर बेशरमाचा फाटा ठेवत त्यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला.
कृषी विभागाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार धाराशिव जिल्ह्यात ७,८८३ मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तसेच मागणी केलेल्या ५,५०० मेट्रिक टन खतासह एकूण सुमारे १३ हजार मेट्रिक टन खत जिल्ह्यात उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
मनोज जाधव यांनी सांगितले की, मागील तीन महिन्यांपासून त्यांनी या प्रकरणी सातत्याने निवेदने देऊन पाठपुरावा केला. “उपलब्ध साठा नेमका कोणत्या शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला?” याची माहिती देण्याची मागणी त्यांनी केली. परंतु संबंधित अधिकाऱ्यांकडून ठोस उत्तर न मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी दूरध्वनीवरून खत मिळत नसल्याची तक्रार केल्यानंतर जाधव यांनी तातडीने युरिया खत उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मात्र प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे देत वेळकाढूपणा केल्यामुळे आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणात सुमारे १३ हजार मेट्रिक टन खताचा साठा काळ्या बाजारात वळवला गेला नाही ना? तसेच सुमारे ४० कोटी रुपयांहून अधिकच्या शासकीय अनुदानाचा गैरवापर झाला नाही ना? असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
शेतकऱ्यांचा हंगाम सुरू असताना खत तुटवडा निर्माण होणे ही चिंताजनक बाब असून प्रशासनाने तात्काळ चौकशी करून पारदर्शक माहिती जाहीर करावी व जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांवर खत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.











