धाराशिव : भूम–परंडा–वाशी मतदार संघातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. तानाजीराव सावंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या मतदार संघासाठी तब्बल ४० नव्या कोऱ्या एसटी बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार असून विद्यार्थ्यांपासून शेतकरी, कामगार आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गेल्या काही वर्षांत वाढती प्रवासी संख्या, जुन्या बसेसची समस्या आणि अपुरी फेऱ्या यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर आमदार सावंत यांनी राज्य परिवहन विभागाकडे वारंवार पाठपुरावा करून नव्या बसेसची मागणी केली होती. त्यानुसार संबंधित विभागाने ४० नवीन बसेस मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे.
या नव्या बसेसमुळे ग्रामीण व दुर्गम भागांतील गावांना अधिक चांगली जोडणी मिळणार आहे. तसेच शाळा–महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेळेत प्रवास करता येणार असून स्थानिक व्यापार व दळणवळणालाही चालना मिळेल.
नागरिकांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत आमदार तानाजी सावंत यांचे आभार मानले आहेत. लवकरच या बसेस प्रत्यक्ष सेवेत दाखल होणार आहेत.











