एसटी प्रशासनाच्या आदेशाला चालक-वाहकांकडून केराची टोपली; तेरखेडा येथील ग्रामस्थ आक्रमक, आंदोलनाचा इशारा
धाराशिव – तेरखेडा गावात बस नेण्याबाबत एसटी प्रशासनाने स्पष्ट आदेश दिले असतानाही चालक आणि वाहकांकडून त्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तेरखेडा येथील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड कायम असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
तेरखेडा मार्गावरील काही एसटी बस गावात न जाता थेट उड्डाण पुलावरून धावत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रोजच्या प्रवासासाठी अडचणींचा सामना करावा लागत असून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनाही गैरसोय होत आहे.
तेरखेडा येथील नागरिक प्रमोद धुमाळ यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर धाराशिव विभाग नियंत्रकांनी संबंधित आगार व्यवस्थापकांना चालक-वाहकांना सूचना देण्याचे आदेश दिले होते. मात्र, आदेशानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झाला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

“फक्त कागदोपत्री आदेश दिले जातात, प्रत्यक्षात मात्र बस गावात येत नाही,” अशी नाराजी प्रवाशांनी व्यक्त केली. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तेरखेडा ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तेरखेडावासीयांनी दिला आहे











