धाराशिव – धाराशिव येथील श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित अध्यापक विद्यालय (डी.एड. महाविद्यालय) येथे विद्यार्थ्यांकडून शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कापेक्षा जादा रक्कम आकारण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रकरणी प्रभारी प्राचार्य दत्तात्रय हरीभाऊ पवार यांच्याविरोधात शिक्षण विभाग, आयकर विभाग तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) सामूहिक तक्रार दाखल करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, शासनाच्या नियमानुसार वार्षिक शिक्षण शुल्क ३,३०० रुपये असताना विद्यार्थ्यांकडून ६,५०० रुपये आकारले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापैकी ३,३०० रुपयांची अधिकृत पावती दिली जात असून उर्वरित रकमेची पावती दिली जात नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


तसेच, अतिरिक्त रकमेच्या मोबदल्यात विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक वह्या आणि गणवेशासाठी कापड सक्तीने देण्यात येत असल्याचा तसेच या व्यवहारात आर्थिक अनियमितता झाल्याचाही आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठ वर्षांपासून ही पद्धत सुरू असून सुमारे २५ लाख ६० हजार रुपयांची अतिरिक्त वसुली झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, जादा वसूल केलेली रक्कम विद्यार्थ्यांना परत द्यावी, तसेच आर्थिक व्यवहारांचे स्वतंत्र लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणी तक्रारदार विद्यार्थ्यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत संबंधित प्रभारी प्राचार्य किंवा संस्थेची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाच्या चौकशीनंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.











