धाराशिव – सध्या सुरु असलेल्या आखाती युध्दाने देशाचे उर्जेसाठी असणारे स्वावलंबन आधोरेखीत केले आहे. त्यातच हरित उर्जेला अनन्यसाधारण महत्व आहे. हरीत ऊर्जेच्या क्षेत्रातील महाराष्ट्राच्या वाटचालीकडे पाहिले असता धाराशिव जिल्ह्यातील पवनउर्जा व सौर उर्जेसाठी असणार्या पोषक वातावरणामुळे धाराशिव जिल्हा हा पवनउर्जेचे ’पॉवरहाऊस’ ठरतो आहे.
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या (MEDA) उपलब्ध माहितीनुसार, राज्यात सध्या सुमारे ६२३ पवनऊर्जा प्रकल्प कार्यरत असून त्यापैकी ३०० हून अधिक प्रकल्प एकट्या धाराशिव जिल्ह्यात आहेत. ही संख्या राज्यातील कोणत्याही एका जिल्ह्यातील सर्वाधिक मानली जाते. त्यामुळे धाराशिवने पवनऊर्जा क्षेत्रात विक्रमी आघाडी घेतली आहे.
पवनऊर्जा प्रकल्पांच्या संख्येत मराठवाडा विभागाने राज्यात विशेष स्थान मिळवले आहे. धाराशिवसह बीड, लातूर आणि नांदेड परिसरातील पठारी भूभाग पवनऊर्जेसाठी पोषक असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे. वाहणार्या वार्याच्या शक्तीमुळे पवनचक्कीची पाती फिरतात. या फिरत्या गतीचे रूपांतर जनरेटरद्वारे विद्युत ऊर्जेत केले जाते. कोणत्याही इंधनाची आवश्यकता नसल्याने पवनऊर्जा ही पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जा मानली जाते. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि हरित ऊर्जेला चालना देण्यासाठी पवनऊर्जा महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
केंद्र व राज्य शासनाने अक्षय ऊर्जेचा वापर वाढविण्यावर भर दिला असून भविष्यात पवन आणि सौर ऊर्जा क्षेत्रात आणखी गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत धाराशिव जिल्हा महाराष्ट्राच्या हरित ऊर्जा क्रांतीचा प्रमुख केंद्रिंबदू म्हणून उदयास आला आहे.
जिल्ह्यात सध्या १० ते ११ पवनउर्जा कंपन्या काम करत आहेत. जिल्हा प्रशासन तसेच पोलिस प्रशासनाचेही या कंपन्याना योग्य ते सहकार्य मिळत आहे. पवनउर्जा कंपन्या तसेच शासनाच्या योग्य समन्वयामुळे कंपन्याचा कामांना गती मिळत आहे. त्यामुळे राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी सुमारे अर्ध्या पवनचक्क्या या केवळ धाराशिव जिल्ह्यात आहेत. ही धाराशिव जिल्ह्यासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे.
पवन ऊर्जा व सौर ऊर्जा हे ऊर्जेचे अतीशय स्वच्छ, शाश्वत स्रोत असून पर्यावरणसाठी पूरक आहेत. धाराशिव सारख्या आकांक्षीत जिल्ह्याच्या विकासासाठी, शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी, तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी अशा प्रकल्पाची गरज आहे. धारशिवमध्ये पवन ऊर्जेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली आहे, ज्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार आणि आर्थिक हालचालींमध्ये वाढ झाली आहे. तथापि, दुर्दैवाने काही असे घटक देखील आहेत जे या कामांच्या प्रगतीमध्ये अडथळा आणतात. शेतकरी आणि कंपन्यांमधील नुकसानभरपाई निश्चित करणे, मार्गाचा अधिकार (Right of Way) मिळवणे आणि व्यवसायाशी संबंधित सर्व परवानग्या देणे यांसारखे वाद/प्रश्न धारशिव जिल्हा प्रशासन स्वतःहून (सक्रियपणे) सोडवत आहे.
- किर्ती किरण पुजार, जिल्हाधिकारी, धाराशिव.











