धाराशिव – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून भाजपचे बसवराज पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी महायुतीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची अत्यंत मर्यादित उपस्थिती दिसून आल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मोजकेच पदाधिकारी उपस्थित असल्याचे दिसून आले. त्यामध्ये माजी सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे आणि लोहारा तालुका शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनुरे यांचा प्रामुख्याने समावेश होता.

याव्यतिरिक्त शिवसेनेतील अन्य प्रमुख पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांची उपस्थिती फारशी जाणवली नाही.याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याही काही मोजक्याच पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावल्याचे दिसून आले. त्यामुळे महायुतीचे चित्र वरवर एकसंध दिसत असले तरी प्रत्यक्षात सर्व काही सुरळीत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तानाजी सावंत गटाची अनुपस्थिती चर्चेचा विषय
विशेष म्हणजे, राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्याशी संबंधित मानल्या जाणाऱ्या गटातील अनेक प्रमुख चेहरे या कार्यक्रमात दिसून न आल्याने राजकीय चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. सावंत गटातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती ही केवळ योगायोग आहे की त्यामागे काही राजकीय नाराजी दडलेली आहे, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण!
महायुतीकडून अधिकृत उमेदवार घोषित झाल्यानंतर सर्व घटक पक्ष एकत्र येऊन शक्तिप्रदर्शन करतील, अशी अपेक्षा होती. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी दिसून आलेल्या उपस्थितीमुळे महायुतीतील अंतर्गत समन्वय आणि स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे “महायुतीमध्ये सर्व काही अलबेल आहे का?” अशी चर्चा कार्यकर्ते आणि राजकीय निरीक्षकांमध्ये रंगू लागली आहे.दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माहिती कडून पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेसाठी देखील शिवसेना शिंदे गटातील एक केवळ एकच पदाधिकारी उपस्थित दिसून आला. या घडामोडीं बाबत भाजप पक्षांकडून महायुती म्हणून आम्ही सर्व एकत्रित आहोत असे जरी सांगण्यात येत असले तरी महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्रितपणे मैदानात उतरतात की नाही? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.











