धाराशिव – आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बेंबळी जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक शनिवार (दि. 27 डिसेंबर) रोजी बेंबळी येथे पार पडली. या बैठकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटनात्मक स्थितीचा सविस्तर आढावा घेतला.
बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांच्या सूचना, अडचणी, स्थानिक प्रश्न तसेच अपेक्षा यांची सविस्तर चर्चा करण्यात आली. निवडणूक ही केवळ उमेदवाराची नसून प्रत्येक कार्यकर्त्याच्या निष्ठा, मेहनत आणि संघटनशक्तीची परीक्षा असते. त्यामुळे उमेदवार कोणीही असो, त्याला निवडून आणण्याची जबाबदारी ही सर्वांचीच आहे, असे ठाम मत आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी कार्यकर्त्यांनी आपला जनसंपर्क अधिक बळकट करत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचावे.

झालेल्या विकासकामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडत सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी प्रामाणिकपणे जोडले जावे, असे आवाहन करण्यात आले. संघटन मजबूत ठेवून बूथ पातळीवर प्रभावी काम केल्यास निवडणुकीत निश्चित यश मिळू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बेंबळी जिल्हा परिषद गटात सक्षम, स्वच्छ प्रतिमेचे आणि जनतेसाठी सातत्याने काम करणारे उमेदवार देत जनतेच्या विश्वासावर निवडणुका जिंकण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या आढावा बैठकीस बेंबळी जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











