धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात झालेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने प्रभावी आणि दमदार कामगिरी करत जिल्ह्यात आपली ‘ताकद’ पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
भाजपच्या या यशामागे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे सक्षम, संयमी नेतृत्व त्याचबरोबर संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केलेली सकारात्मक ऊर्जा निर्णायक ठरली. निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीपासूनच दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी जिल्हाभर आढावा बैठका, बूथनिहाय नियोजन, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण व मतदारांशी थेट संवाद यावर विशेष भर दिला होता. विकास, पारदर्शक प्रशासन आणि लोकाभिमुख धोरणे या मुद्द्यांवर भाजपने प्रचार राबवत मतदारांचा विश्वास संपादन केला. अनेक नगरपरिषदांमध्ये भाजप उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला असून काही ठिकाणी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात भाजपची ताकद अधिक भक्कम झाली असून नगरपंचायत व जिल्हापरिषद निवडणुकांमध्ये भाजपला याचा फायदा होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
या यशाबद्दल बोलताना जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी म्हणाले, “हा विजय पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा आहे. जनतेने विकासाला कौल दिला असून आम्ही त्यांच्या विश्वासास पात्र ठरण्याचा प्रयत्न करू व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अधिक ताकदीने व जोमाने उतरू”
भाजपच्या या यशाचे श्रेय संघटनात्मक एकजूट, शिस्तबद्ध प्रचार आणि नेतृत्वाच्या ठोस धोरणांना दिले जात असून धाराशिव जिल्ह्यात भाजपलाच जनाधार अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले असून दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वाची चुणूक दिसून आली आहे.











