धाराशिव – जिल्ह्यात पवनचक्की निर्मितीचे कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. यामध्ये पवनचक्की कंपनीला तसेच शेतकऱ्यांना येणार्या अडचणी ह्या संदर्भात जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रत्येक महिन्याला या समितीची सुनावणी सुरु असून अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याची माहिती जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिली.
धाराशिव जिल्हा हा देशात आकांक्षित जिल्ह्यात तिसर्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार पवन व सौर ऊर्जा वर आधारित प्रकल्प मोठ्या प्रमाणावर येत आहेत. जागतिक कंपन्या जिल्ह्यात गुंतवणूक करण्यास तयार असून त्यातून जिल्ह्याची वेगळी ओळख तयार होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात तरुणांना रोजगार व शेतकर्यांना मोबदला मिळत आहे. तसेच जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात डोंगराळ, माळराण जमिन असून अशा जमिनीचा वापर पवन व सौर ऊर्जा प्रकल्पा साठी होत असून त्याचा आर्थिक फायदा या भागातील शेतकर्यांना होत आहे. मात्र, हे प्रकल्प उभारत असताना पवनउर्जा कंपन्यांना चोरी, खंडणी, अडवणूक, मारहाण या सारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रकल्प उभारणीस विलंब होत आहे. याचा फटका पवनउर्जा कंपन्यांना बसतो आहे. यासंदर्भात बोलताना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार म्हणाले की, जिल्ह्यात काम करणार्या पवनउर्जा कंपन्या तसेच शेतकर्यांना येणार्या अडचणी, त्यांच्या तक्रारी संदर्भात यापुर्वीच तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच विभागीय पातळीवर देखील ही समिती काम करत आहे. शेतकर्यांच्या, तसेच पवनउर्जा कंपन्यांच्या तक्रारी संदर्भात सुनावण्या घेण्यात येत आहेत. तसेच जिल्हास्तरीय समितीचेही कामकाज समाधानकारक सुरु आहे. नोव्हेंबर महिन्यात पालकमंत्री महोदयांनी देखील बैठक घेवून यासंदर्भात सूचना केल्या आहेत. यावर देखील काम सुरु असल्याचे ते म्हणाले.
चोर आणि खंडणीखोरांवर कठोर कारवाई
परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ४ नोव्हेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक इतर अधिकारी, पवन ऊर्जा प्रकल्पांचे प्रतिनिधी आणि शेतकरी यांच्या समवेत बैठक घेतली. या बैठकीत मंत्री सरनाईक यांनी पवन उर्जा प्रकल्पात अनेक तक्रारी आपल्याकडे प्राप्त झालेल्या आहेत. पोलीस प्रशासनाने त्यांच्या विरोधात तक्रार येण्याची वाट न पाहता सुओमोटो गुन्हे दाखल करावेत. अशा गुंडां पासून जिल्ह्यात निर्भय वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. याबरोबरच संबंधित कंपनीला पवनचक्की उद्योग उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ते सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.











