भारत दक्षिण-आफ्रिका यांच्यातील लखनऊच्या मैदानावर होणारा चौथा टी-20 सामना मैदानावर धुक्याची चादर पसरल्याने अखेर रद्द करण्याची वेळ आली. मैदानावर खेळाडू उतरायच्या आधीच परिस्थिती इतकी धोकादायक झाली की सामना खेळवणं अशक्य ठरलं. हा केवळ एक सामना रद्द होण्याचा प्रकार नव्हता, तर भारतीय क्रिकेट नियोजनावर पुन्हा एकदा बोट ठेवलं गेलं.
डिसेंबर आला की उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये दाट धुके, थंड हवा आणि प्रदूषण यांचा त्रास वाढतो, हे नवं नाही. दिल्ली, लखनऊसारख्या भागांमध्ये याच काळात दृश्यमानता कमी होणं, खेळाडूंच्या आरोग्यावर परिणाम होणं आणि सामन्यांच्या वेळापत्रकात गोंधळ होणं, हे वर्षानुवर्षे पाहायला मिळतं. तरीही दरवेळी आंतरराष्ट्रीय सामने याच काळात इथेच ठेवले जातात आणि नंतर अनिश्चिततेचा खेळ सुरू होतो.
या सामन्याच्या रद्दीकरणानंतर चाहते आणि क्रिकेट अभ्यासकांनी पुन्हा एकदा बीसीसीआयच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली आहे. “हवामानाचा अंदाज घेणं इतकं अवघड आहे का?” असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. अनेक क्रिकेटप्रेमींना असं वाटतं की हिवाळ्यातील महत्त्वाचे सामने दक्षिण भारतातील शहरांमध्ये ठेवणं हा जास्त व्यवहार्य पर्याय ठरू शकतो. चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद किंवा तिरुवनंतपुरमसारख्या ठिकाणी या काळात हवामान तुलनेने स्थिर असतं आणि सामने सुरळीत पार पडण्याची शक्यता अधिक असते.
सतत अशा घटना घडणं ही केवळ चाहत्यांसाठी निराशाजनक बाब नाही, तर खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही चिंतेची गोष्ट आहे. मैदानावर उतरण्यापूर्वीच सामना रद्द व्हावा, ही कोणालाच नको असलेली परिस्थिती आहे. याचा फटका संघाच्या तयारीला, प्रेक्षकांच्या उत्साहाला आणि प्रसारकांच्या नियोजनालाही बसतो.
सोशल मीडियावरही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी या प्रकाराला आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी लाजिरवाणी घटना म्हटलं आहे, तर काहींनी थेट बीसीसीआयलाच भविष्यकाळात तरी हवामानाचा गंभीरपणे विचार करण्याचं आवाहन केलं. आता खरा प्रश्न असा आहे की, या धुक्यातून धडा घेऊन पुढील वेळापत्रक अधिक शहाणपणाने आखलं जाणार का? की पुन्हा-पुन्हा स्वतःचीच पुनरावृत्ती करत राहणार?











