धाराशिव – राजकीय मतभेद असले तरी जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधीचं कौतुक व्हायलाच हवं, अशी भावना सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. ठाकरे सेनेचे धाराशिव-कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांच्या कामाचं भाजपच्या कट्टर समर्थकांकडूनही सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार कैलास पाटील यांनी शेतकरी, सर्वसामान्य नागरिक तसेच धाराशिव जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न आक्रमकपणे सभागृहात मांडल्याची चर्चा आहे. त्यांच्या मुद्देसूद मांडणीमुळे आणि सरकारचे लक्ष वेधण्याच्या भूमिकेमुळे अनेकांनी सोशल मीडियावर त्यांचं अभिनंदन केलं आहे.
विशेष म्हणजे, भाजप विचारसरणीशी संबंधित अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनीही पक्षीय भूमिका बाजूला ठेवत कैलास पाटील यांच्या कामाचं कौतुक करणाऱ्या पोस्ट आणि प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. “जनतेसाठी लढणारा आमदार पक्षापेक्षा महत्त्वाचा,” अशा आशयाच्या प्रतिक्रियाही मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत.
विरोधी पक्षातील आमदाराच्या कामाची सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांकडून होत असलेली दखल ही सध्या धाराशिवच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
धाराशिव जिल्ह्यात नुकतीच राजकीय घडामोड घडत ठाकरेंचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंचा हात पकडत शिंदेंच्या शिवसेनेते दाखल झाले मात्र, खासदार ओमराजेंसोबत सावलीसारखे वावरणारे आमदार कैलास पाटील हे मात्र ठाकरेंच्या शिवसेनेत राहून सरकारशी जनतेच्या प्रश्नांवर आक्रमकपणे मैदानात उतरले असल्याने शिवसैनिकांकडून देखील कैलास पाटील यांना डोक्यावर घेतलं जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कैलास पाटील यांच्यासाठी राजकारणात मोठी संधी उपलब्ध होणार असल्याची चर्चा देखील कार्यकर्त्यांमधून व सामान्य नागरिकांतून होताना दिसून येत आहे











