धाराशिव – उस्मानाबाद-बीड-लातूर विधान परिषद निवडणुकीचा प्रचार आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून सर्व पक्षांनी आपापली ताकद पणाला लावली आहे. मात्र या संपूर्ण राजकीय रणधुमाळीत आमदार तानाजी सावंत यांच्या भूमिकेभोवती मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सावंत गटाकडे सुमारे 35 मतदानांचे संख्याबळ असल्याची चर्चा सुरू असताना अद्याप त्यांनी उघडपणे कोणत्याही बाजूने स्पष्ट भूमिका घेतलेली दिसत नाही.
महायुतीच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असताना सावंत यांची शांतता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. प्रचार जोरात सुरू आहे, बैठका, संपर्क मोहीम, मतदारांशी संवाद सुरू आहे; मात्र सावंत यांची अपेक्षित राजकीय सक्रियता दिसत नसल्याने अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
राजकीय निरीक्षकांच्या चर्चेनुसार, सावंत गटाकडे असलेले मतांचे संभाव्य संख्याबळ निकालाच्या समीकरणात महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे सावंत नेमके कोणत्या रणनीतीने पुढे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुतीसोबत राहून अधिकृत भूमिकेला पाठिंबा देणार की स्वतंत्र राजकीय संदेश देणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने विरोधकांपासून समर्थकांपर्यंत सर्वांकडून चर्चांना वेग आला आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सावंत यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना प्रत्येक मत महत्त्वाचे ठरत आहे. अशा परिस्थितीत सावंत यांचा पुढील निर्णय केवळ एका गटापुरता मर्यादित न राहता संपूर्ण निवडणुकीच्या राजकीय चित्रावर परिणाम करू शकतो, अशी चर्चा रंगत आहे. सावंत शांत आहेत की योग्य वेळेची वाट पाहत आहेत? याचे उत्तर पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.











