धाराशिव– उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या असून, धाराशिव भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे नाव सध्या चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे, तीनही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सुमारे २५२ सदस्यांचा त्यांना पाठिंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. स्वभाव चांगल्या संपर्कामुळे अनेक अपक्ष व विरोधी पक्षातील नगरसेवक संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्यांनी दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या उमेदवारीसाठी अनुकूल भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. काही सदस्यांनी समर्थनार्थ सह्याही केल्याची माहिती समोर येत असून, त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
दरम्यान, दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी अर्जाचा फॉर्म घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या नावाभोवती सुरू असलेल्या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे. भाजपकडून अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नसली, तरी स्थानिक स्तरावरील हालचालींमुळे त्यांची दावेदारी मजबूत मानली जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती पदाधिकारी, नगराध्यक्ष तसेच इतर स्थानिक प्रतिनिधींची भूमिका निर्णायक ठरते. त्यामुळे कोणत्या नेत्यामागे किती संख्याबळ उभे आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धाराशिव जिल्ह्यात भाजपने गेल्या काही वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला प्रभाव वाढवला आहे. त्याचबरोबर महायुतीतील विविध घटकांमध्ये समन्वय राखताना दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी सक्रिय भूमिका बजावल्याने त्यांची संघटनात्मक नेता म्हणून ओळख निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. बीड आणि लातूर जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांकडूनही त्यांच्या नावाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत धाराशिव जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणीही काही कार्यकर्त्यांकडून पुढे येत आहे.
राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नावाला भाजपचे ज्येष्ठ नेते सुजितसिंह ठाकूर, आमदार राणाजगजितसिंह पाटील तसेच माजी मंत्री बसवराज पाटील यांच्याकडून अनुकूलता मिळू शकते. महायुतीतील विविध गटांमध्ये स्वीकारार्ह चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्याचे बोलले जात आहे.
विधान परिषद उमेदवारीबाबत अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींकडून घेतला जाणार असला, तरी सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे दत्ताभाऊ कुलकर्णी हे या मतदारसंघातील चर्चेचे प्रमुख नाव ठरत आहेत.











