धाराशिव – धाराशिव जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदासाठी भाजपच्या अर्चना पाटील यांचे नाव आघाडीवर असताना आता या पदावर वेगळाच चेहरा समोर येणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
महायुतीला जिल्हा परिषदेत संख्याबळाच्या दृष्टीने चांगल्या जागा मिळाल्या असल्या तरी, शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी दिलेल्या थेट इशाऱ्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
काय म्हणाले होते तानाजी सावंत?
“जे जे आपल्या पत्नीला अध्यक्ष बनवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत, त्यांचा टांगा पलटी करून घोडे फरार करू,” तसेच भगव्याचा, धनुष्यबाणाचा अध्यक्ष बसवल्याशिवाय हा तानाजी सावंत स्वस्थ बसणार नाही. यासाठी काय नीती चाणक्यनिती वापरायची ती ठरवेन असा खळबळजनक इशारा तानाजी सावंत यांनी दिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
हा इशारा नेमका कोणासाठी होता, याची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे. या वक्तव्यानंतर महायुतीतील अंतर्गत नाराजी, डावपेच आणि नव्या समीकरणांची शक्यता नाकारता येत नाही. तानाजी सावंत हे वेगळं राजकीय समीकरण जुळवून अध्यक्षपदासाठी नवा डाव टाकणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या सगळ्या घडामोडींमुळे अर्चना पाटील यांच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या स्वप्नांवर विरोधकांची चादर पडणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. सत्तेत असतानाही अंतर्गत विरोध, इशारे आणि राजकीय कुरघोडीमुळे अध्यक्षपदाचा मार्ग सोपा राहिलेला नाही.
आगामी काही दिवसांत होणाऱ्या हालचालींवरूनच धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर नाव बदलणार की राजकीय धक्कातंत्राने चित्र उलटणार, हे स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत मात्र धाराशिवचे राजकारण चांगलेच तापलेले दिसत आहे.











