धाराशिव – धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवारीवरून पक्षांतर्गत असंतोष उफाळून आला आहे. निष्ठावंतांना डावलून आयरामांना “लाल गालीचा” अंथरल्याने निष्ठावंतांनी एल्गार पुकारत अपक्ष लढवण्याची तयारी केली असल्याचे चित्र धाराशिव जिल्ह्यात पहायला मिळत आहे.
धाराशिव तालुक्यातील खानापूर येथील माजी सरपंच व भाजपच्या माजी महिला जिल्हाध्यक्षा माधुरी गरड यांना डावलून, अंबेजवळगा गटातून ठाकरे गटातून भाजपमध्ये आयात केलेले शाम जाधव यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. माधुरी गरड या गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या विचारधारेसाठी काम करत असून, ग्रामपंचायतपासून ते तालुका पातळीवर त्यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी सातत्याने योगदान दिले आहे. असे असताना, त्यांना डावलून बाहेरून आलेल्या उमेदवाराला थेट जिल्हा परिषदेसारख्या महत्त्वाच्या निवडणुकीत संधी दिल्याने “निष्ठेपेक्षा आयातीला प्राधान्य” दिले जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
या निर्णयामुळे अंबेजवळगा गटासह परिसरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून, काहींनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. “पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्यांना डावलून आयात उमेदवारांना संधी दिली जात असेल, तर कार्यकर्त्यांनी का काम करावे?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, भाजप नेहमीच निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका घेत असल्याचा दावा करत आला आहे. मात्र, प्रत्यक्षात उमेदवारी वाटपात वेगळेच चित्र दिसत असल्याने पक्षाच्या स्थानिक नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या उमेदवारीमुळे भाजपच्या मतांवर परिणाम होणार का, तसेच माधुरी गरड व इतर नाराज मंडळी तसेच नाराज कार्यकर्ते कोणती भूमिका घेणार, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर उभा राहिलेला हा अंतर्गत वाद भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.











