धाराशिव – धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीपूर्वीच जिल्ह्याच्या राजकारणात धक्कादायक समीकरणे आकार घेत आहेत. एकीकडे बहुतांश जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीचे झेंडे खांद्यावर घेऊन एकत्र उतरणार असताना, भूम, परांडा आणि वाशीमध्ये मात्र सत्तासंघर्षाची नवी फळी उभी राहताना दिसत आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील बहुतांश गटांमध्ये भाजप-सेना युती कायम राहणार असून दोन्ही पक्ष स्थानिक पातळीवर समन्वय साधत आक्रमक प्रचाराची तयारी करत आहेत. मात्र ही युती भूम, परांडा आणि वाशीमध्ये अक्षरशः फुटताना दिसणार आहे. या तीन तालुक्यांमध्ये आमदार तानाजी सावंत यांना राजकीयदृष्ट्या एकाकी पाडण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (उबाठा) यांनी पडद्यामागे हातमिळवणी केल्याची जोरदार चर्चा आहे. सावंतांच्या वाढत्या वर्चस्वाला लगाम घालण्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्याचा निर्धार केल्याचे दिसत आहे. हा केवळ निवडणूक करार नसून सावंतांविरोधातील राजकीय ‘महाआघाडी’ असल्याचे बोलले जात आहे.
भूम, परांडा आणि वाशीमध्ये आमदार तानाजी सावंत यांचा प्रभाव निर्णायक मानला जातो. त्यामुळेच त्यांना थेट भिडण्याऐवजी विरोधकांनी एकत्र येण्याची रणनीती आखली आहे. या राजकीय डावपेचामुळे या तीन तालुक्यांमध्ये निवडणूक अत्यंत चुरशीची, टोकाची आणि संघर्षपूर्ण होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. दुसरीकडे, उर्वरित धाराशिव जिल्ह्यात भाजप-सेना युती आपली ताकद दाखवण्यासाठी मैदानात उतरणार असून विरोधकांना चारीमुंड्या चीत करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. यामुळे जिल्हाभरात दुहेरी राजकीय लढत पाहायला मिळणार आहे-एकीकडे युती विरुद्ध महाविकास आघाडी, तर दुसरीकडे भूम-परांडा-वाशीमध्ये युतीतीलच फाटाफूट!
आगामी दिवसांत जागावाटप आणि उमेदवारांची घोषणा होताच या राजकीय भूकंपाचे खरे परिणाम दिसू लागतील. पण तोपर्यंत धाराशिवचे राजकारण तापलेलेच राहणार आहे.











