धाराशिव – माजी मंत्री व भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हे अतिवृष्टी झालेल्या भागात पाहणी दौऱ्यासाठी आले होते. ठाकरेंसोबत संजय राऊत हे देखील या दौऱ्यामध्ये होते. या दौऱ्यावर माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी टीका करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाले तानाजी सावंत?
जेव्हा मराठवाडयातील माझा शेतकरी आणि नागरिक पुराच्या संकटात अडकला आहे, संजय राऊत हा माणूस बांधावर फिरताना दिसला…फक्त पोकळ गप्पा मारून, फोटो काढून शेतकऱ्यांची चेष्टा केली आणि राजकीय पर्यटन करून गेले! लोकांना दिलासा देण्याऐवजी, त्यांच्या दुःखावर ‘भाषण’ देण्याचं काम हा माणूस रोज उठून करतो
या कठीण काळात, जेव्हा सामान्य माणूस सर्वस्व गमावून बसला आहे, तेव्हा राऊत साहेब राजकारणाचे ‘डोस’ पाजत आहेत. त्यांना लाज वाटायला पाहिजे!
हजारो गाव, वाड्या वस्त्या पाण्याखाली असताना, जीव धोक्यात घालून, अक्षरशः पाण्यात उतरून आमचे शिवसैनिक, पदाधिकारी रात्रंदिवस मदत पोहोचवत आहेत! यात जीवनावश्यक वस्तू, कपडे, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि किराणा सामानाचा समावेश आहे. कोणताही पूरग्रस्त बांधव मदतीपासून वंचित राहणार नाही, याची आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत. तुम्ही मात्र ‘बांधावर’ फिरून केवळ पर्यटनाचा टाईमपास केला आणि इथल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं!
संजय राऊत, तुम्ही साधं एक किलो धान्य किंवा एक पाण्याची बाटली तरी स्वतःच्या खिशातून दिली का? की तुमची मदत फक्त माईक आणि कॅमेऱ्यापुरतीच मर्यादित आहे?
संजय राऊत, आतातरी ‘पोकळ गप्पा’ आणि ‘राजकारण’ बाजूला ठेवा, खरंच काही करता येत नसेल तर, निदान शांत बसा असा टोला देखील सावंत यांनी लगावला











