हिंमत असेल तर संपत्तीची अदलाबदल करा, मी गोरगरिबांना वाटून टाकेन – सुनील ढेपे
विरोधातील निवेदनानंतर संपादक सुनील ढेपेंचा राणाजगजितसिंह पाटील यांना थेट इशारा
धाराशिव – धाराशिव लाईव्ह चे संपादक सुनील ढेपे हे आपल्या निर्भीड व स्पष्ट लेखणीने सर्वश्रुत आहेत. धाराशिव लाईव्ह हे जिल्ह्यातील पहिले डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करत संपादकीय क्षेत्रामध्ये पाय ठेवला. यामागे त्यांचा पत्रकारितेतील भरगच्च असा अनुभव राहिला आहे.
तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विरोधात बातम्यांचा सपाटा सुरू ठेवल्याने राणाजगजितसिंह पाटील समर्थकांनी ढेपे यांना टार्गेट करत ‘धाराशिव लाइव्ह’ न्यूज पोर्टल आणि त्याचे संपादक सुनील ढेपे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. या निवेदनाला संपादक ढेपे यांनी अत्यंत आक्रमक आणि कडक शब्दांत खास आपल्या शैलीत प्रत्युत्तर देत “माझ्यावर आरोप करण्याऐवजी हिंमत असेल तर आमदार राणाजगजितसिंह पाटलांनी माझ्याशी संपत्तीची अदलाबदल करावी, त्यांची सर्व संपत्ती मी गोरगरिबांना वाटून टाकेन,” असे दंड थोपटत थेट आव्हानच ढेपे यांनी दिले आहे.
यामध्ये आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या समर्थकांनी दिलेल्या निवेदनात ‘धाराशिव लाइव्ह’ला शासनाची परवानगी नसल्याचा दावा केला आहे. यावर ढेपे यांनी “हा घ्या पुरावा” म्हणत पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा दावा खोडून काढत “आरएनआय” चे पत्र प्रसिद्ध केले आहे.

या निवेदनातील दुसरी मागणी संपादक सुनील ढेपे यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) तपासण्याची होती. या मागणीला केवळ सहमती न दर्शवता, ढेपे यांनी एक पाऊल पुढे टाकत, “माझे CDR जरूर तपासा, पण सोबत आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि मल्हार पाटील यांचेही CDR तपासले पाहिजेत,” अशी प्रतिमागणी केली आहे.
तिसरा आणि सर्वात गंभीर आरोप ढेपे यांच्या पुण्यातील संपत्तीच्या चौकशीची मागणी हा होता. यावर सुनील ढेपे यांनी संताप व्यक्त करत म्हटले, “माझ्या संपत्तीची जरूर चौकशी करा, पण त्याचवेळी राणाजगजितसिंह पाटील आणि त्यांच्या कार्यकर्तांच्या संपत्तीचीही निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे.”
आपल्या भूमिकेला अधिक धार देत ढेपे यांनी एक अभूतपूर्व आव्हान दिले आहे. ते म्हणाले, “माझी सगळी संपत्ती आमदार राणाजगजितसिंह पाटलांच्या नावावर करा आणि त्यांची माझ्या नावावर करा. मी ती सर्व संपत्ती इथल्या गोरगरिबांना वाटून टाकीन.”
शेवटी, पोलिसांमार्फत दबाव टाकण्याच्या या प्रकारावर बोट ठेवत ढेपे यांनी सुनावले, “चमच्यांनो, जर तुमची खरंच बदनामी झाली असेल, तर कायदेशीर मार्ग वापरा आणि कोर्टात दावा दाखल करा. प्रत्येक वेळी पोलिसांचा आधार का घेता?”
या थेट आणि आक्रमक उत्तरानंतर धाराशिवच्या राजकीय आणि पत्रकारिता वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











