आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्यासमोर ‘राज्यमंत्री’ पदाची नेमप्लेट आणि धाराशिवचं राजकारण हसून बेशुद्ध!
धाराशिव – राजकारणात ‘नेम’कं काय होईल, याचा काही ‘नेम’ नाही, पण काही वेळा ‘नेमप्लेट’ काय सांगून जाईल याचाही ‘नेम’नसतो! अशीच एक ‘हटके’ स्क्रिप्ट सध्या धाराशिवच्या राजकारणात रंगली आहे.
आता बघा ना… तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील – दोन वेळा आमदार, एकदा “भावी मंत्री”, दुसऱ्यांदा “पक्के मंत्री” व्हायचं राहून गेलं. आणि आता ते थेट ‘राज्यमंत्री’च! काय..विश्वास बसत नाही? बसणारच नाही, कारण हे पद त्यांना मिळालंच नाहीये… मिळालीये ती फक्त नेमप्लेट!
‘भावी पालकमंत्री’ ते ‘मी मित्रा’चा उपाध्यक्ष!
साहेबांचे समर्थक सोशल मीडियावर एकेकाळी “भावी पालकमंत्री” म्हणून डंका वाजवत होते. पण मंत्रिमंडळात प्रवेश न झाल्यामुळे बरेचसे कार्यकर्ते कोपऱ्यात गेले होते. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘शाब्बास बच्चा!’ म्हणत त्यांना महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) या सल्लागार संस्थेचे उपाध्यक्षपद बहाल केलं.



आणि मग काय? साहेबांचा थाट एकदम पालकमंत्री टाईप! जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये बैठक, अधिकाऱ्यांना सूचना, जिल्हा नियोजनच्या चर्चांमध्ये फाईल वाचणे वगैरे सुरू झालं. हे पाहून कार्यकर्त्यांच्या उरात फुलं फुलायला लागली — “दादा आता मंत्रीच झाले!”
‘राज्यमंत्री’ नेमप्लेटचा थरार
मग आला १ मे – नेमप्लेटच चर्चेचा विषय बनली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठक खोलीत आमदार राणा पाटील यांच्या समोर ठेवलेली ‘राज्यमंत्री’ लिहिलेली नेमप्लेट म्हणजे ‘स्माईल विथ स्टाईल’चा झंझावात होता. साहेबांचं हसू थांबत नव्हतं, कार्यकर्ते तर अक्षरशः ‘मोदी कॅबिनेटमध्ये झेंडा रोवला’ अशा अविर्भावात सेल्फी घेत होते.
माहितीच्या अधिकाराने फोडला ‘फुगा’
कथा इथेच थांबली असती, तर ती छान रंगली असती. पण अचानक एका शहाण्या RTI कार्यकर्त्याने ‘मित्रा उपाध्यक्ष’ पदाचा दर्जा काय, हे विचारून अख्खं प्रकरण पिंजारून टाकलं.
सरकारी दस्ताऐवज सांगतात – ‘मित्रा उपाध्यक्ष’ हे सल्लागार पद आहे, राज्यमंत्री दर्जा नाही!
बस्स… आणि इकडे ‘राज्यमंत्री’ पाटी पाहून जे हसले होते, त्याच लोकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं.
मग नेमप्लेट कुणी लावली?
हा तर थेट ‘पॉलीटिकल CID’चा विषय!
- ही पाटी कुणी छापली?
- कुणी ठेवली?
- साहेबांना माहिती होती की नाही?
- की खुद्द त्यांनीच ‘नावापुढं मंत्रीपद’ चढवलं?
यावर प्रशासन मौनव्रती झालं आहे आणि लोकं चर्चाव्रती.
हा केवळ ‘नेमप्लेट’ गेम आहे की ‘नेमलेलं प्लॅनिंग’…? कार्यकर्त्यांचा अतिउत्साह आहे की सत्तेचा मोह? उत्तर येईलच, पण तोवर ‘राज्यमंत्री पाटी’ धाराशिवच्या राजकारणात एकदम ‘चाय पे चर्चा’ चा विषय बनली आहे.











