धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत सामाजिक कामांच्या जोरावर प्रभावी एन्ट्री
धाराशिव – धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत तेर गटातून आम आदमी पार्टीकडून रत्नमाला पिंपळे यांनी उमेदवारी दाखल केल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यापासून त्यांचा प्रचार वेगाने सुरू असून, गावागावात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे तेर गटातील प्रस्थापित विरोधकांची चिंता वाढल्याचे बोलले जात आहे.
रत्नमाला पिंपळे यांचे पती तानाजी पिंपळे हे गेल्या पाच ते सात वर्षांपासून सातत्याने सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. लहान मुलांसाठी शैक्षणिक संकुल उभारणीसाठी त्यांनी पुढाकार घेतला असून, तेर येथील घाट परिसरात स्वच्छता मोहीम राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. यासोबतच तब्बल 2000 झाडांचे वृक्षसंवर्धन करून पर्यावरणपूरक विकासाचा आदर्श त्यांनी उभा केला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही त्या कायम आक्रमक भूमिकेत दिसून आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या ऊस बिलासाठी आंदोलन करून त्यांनी थेट रस्त्यावर उतरून लढा दिला. तसेच गरीब व होतकरू मुलींसाठी सायकल वाटप कार्यक्रम, महिलांसाठी महिला मार्गदर्शन उपक्रम, आणि बचत गटातील महिलांना वैयक्तिक लाभाच्या विविध शासकीय योजना मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

विशेष म्हणजे तानाजी पिंपळे हे मनोज जरांगे पाटील यांचे खंदे समर्थक असून, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा, शेतकरी हित, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धन या मुद्द्यांवर त्या ठामपणे बोलणारे नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
‘राजकारण सेवा करण्यासाठी असते’ या आम आदमी पार्टीच्या भूमिकेला अनुसरून रत्नमाला पिंपळे यांनी तेर गटात स्वच्छ, पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभाराचे स्वप्न मतदारांसमोर मांडले आहे. त्यामुळे येत्या काळात तेर गटातील निवडणूक अधिक चुरशीची होणार असून, ‘आप’च्या या उमेदवाराकडून विरोधकांना खरोखरच घाम फुटणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.











