आधुनिक तंत्रज्ञानामुळे सिंचनक्षेत्र सहा हजारावरून नऊ हजार हेक्टर होणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव – भविष्यात ज्या उपसा सिंचन योजना कार्यान्वित होणार आहेत, त्या सर्व बंद पाईपलाईनद्वारेच राबविण्याचा धोरणात्मक निर्णय महायुती सरकारने यापूर्वीच घेतलेला आहे. त्यामुळे आता निम्न तेरणेचे पाणी बंद पाईपलाईनद्वारे थेट शेतकरी बांधवांच्या शिवारात दाखल होणार आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात टाळला जाणार असून सिंचनक्षेत्र सहा हजार हेक्टरवरून नऊ हजार हेक्टर होणार आहे. सिंचनात दीडपट वाढ होणार असल्याने 23 गावातील शेतकरी बांधवांना त्याचा मोठा लाभ होईल असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
धाराशिव तालुक्यातील केशेगाव, करजखेडा आणि पाटोदा येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार राणाजगजितसिंह पाटील बोलत होते. तुळजापूर, धाराशिव आणि औसा या तीन तालुक्यातील 23 गावांतील शेतीसाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या निम्न तेरणा उपसा सिंचन योजनाच्या दुरुस्ती खर्चास आपल्या महायुती सरकारने 113 कोटी रूपयांंची प्रशासकीय मान्यता दिली आहे. या महत्वपूर्ण योजनेच्या दुरूस्तीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण स्वतः भेटून निधी उपलब्ध करून देण्यासाठी नोव्हेंबर 2022 मध्ये विनंती केली होती. स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी या तिन्ही विभागाकडून अंदाजपत्रक तयार करून घेणे मोठे जिकिरीचे काम होते. अनेक त्रुटी होत्या. त्या दूर करून तिन्ही विभागाच्या समन्वयाने दुरूस्तीच्या कामास मंजुरी घेतली आहे. आता निम्न तेरणेतून 23 गावांतील शेतकरी बांधवांच्या थेट शिवारात बंद पाईपलाईनद्वारे पाणी येणार असल्याचे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.

तेरणा धरणातून तेर येथे याच प्रकारे बंद पाईपलाईनद्वारे योजना राबविण्यात आली होती. काही तांत्रिक अडचणीमुळे त्यात बाधा निर्माण झाल्या. आता नवीन तंत्रज्ञानामुळे या तांत्रिक त्रुटी दूर झाल्या आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी बंद पाईपलाईनचा वापर करून यशस्वीरित्या राबविल्या जात आहेत. तेर येथील तांत्रिक अडचण देखील आता या नव्या तंत्रज्ञानामुळे दूर होणार आहे. 23 गावांतील सहा हजार हेक्टर क्षेत्र या उपसा सिंचन योजनेमुळे पाण्याखाली येणार होते. त्यात आता दीडपट वाढ होवून नऊ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल, असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे. बंद पाईपलाईनद्वारे थेट निम्न तेरणा प्रकल्पातून पाणी 23 गावातील शेतकर्यांच्या थेट शिवारापर्यंत पोहोचविले जाणार आहे. त्यामुळे कमी वेळेत पाण्याचा अपव्यय न होता जास्तीत जास्त पाणी उपलब्ध होत असल्याने साहजिकच सिंचन क्षेत्रात दीडपटीने वाढ होणार असल्याचा दावा आमदार पाटील यांनी केला आहे.
अधिक अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा
निम्न तेरणा योजनेसाठी डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे तेंव्हाच 42 दलघमी पाणी आरक्षित करून ठेवण्यात आले आहे. त्यात काहीही बदल झालेला नाही आणि होणारही नाही. अशक्यप्राय वाटणारे अनेक प्रकल्प आणि योजना मागील अडीच वर्षांच्या काळात आपल्या सर्वांच्या सोबतीने यशस्वी करून दाखविल्या आहेत. भविष्यात यापेक्षाही अधिक ताकदीने आपल्याला पुढे जावयाचे आहे. त्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य महत्वपूर्ण असल्याचेही आमदार पाटील यावेळी म्हणाले.