धाराशिवकर ठरले पुन्हा एकदा “राजकीय खेळीचे बळी”?
धाराशिव – धाराशिव शहरातील तब्बल १४० कोटी रुपयांच्या रस्ते विकास प्रकल्पाला राजकीय कुरघोडीचे ग्रहण लागल्याचे चित्र धाराशिवच्या राजकारणात पहायला मिळत आहे. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील तथाकथित वादामुळे हा संपूर्ण प्रकल्प अडकल्याची चर्चा सुरू सध्या आहे. मागील अठरा महिन्यांपासून हा राजकीय कुरघोडीचा खेळ सुरू असून जिल्ह्याचे ठिकाण असूनही धाराशिव शहरातील रस्ते बकाल अवस्थेत असल्याने नागरिकांना या खराब रस्त्यांचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने नगरोत्थान महाभियानांतर्गत मंजूर असलेल्या या रस्ते विकास प्रकल्पाच्या कार्यादेशाला तूर्तास स्थगिती दिली आहे.
नगर विकास विभागाने धाराशिव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना २८ ऑक्टोबर, २०२५ रोजी पाठवलेल्या पत्रात हे आदेश दिले आहेत. या प्रकल्पासंदर्भात शासनाकडे एक तक्रार प्राप्त झाली असून, या तक्रार / निवेदनातील वस्तुस्थिती तपासून याबाबतचा स्वयंस्पष्ट अहवाल शासनास सादर करावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. हा अहवाल येईपर्यंत प्रकल्पाच्या निविदेच्या अनुषंगाने कार्यादेश देण्याच्या शिफारशीस स्थगिती देण्यात आली आहे.
या रस्ते विकास प्रकल्पाला २३ फेब्रुवारी, २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. त्यानंतर १८ सप्टेंबर, २०२५ रोजी झालेल्या राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीच्या बैठकीत या प्रकल्पाच्या निविदेचा प्रस्तावही सादर करण्यात आला होता.
मात्र, आता थेट शासनानेच या प्रक्रियेला स्थगिती दिल्याने, राजकीय कुरघोडी आणि प्रशासकीय तक्रारींच्या कचाट्यात हा १४० कोटींचा प्रकल्प अडकला आहे. चौकशी अहवाल सादर झाल्यानंतरच या प्रकल्पाचे भवितव्य ठरणार असून धारशिवकर पुन्हा एकदा राजकीय कुरघोडीचे बळी ठरले असून गुळगुळीत रस्त्यांसाठी येथील नागरिकांना अजून किती दिवस वाट पाहावी लागणार आहे? असा संतप्त सवाल धारशिवकर एकमेकांना विचारत आहेत











