धाराशिव – मराठवाड्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ सुफी संत हजरत खाजा शमशुद्दीन गाजी (रहे.) यांच्या वार्षिक उरूसाला २ जानेवारी २०२६ पासून सुरुवात होत असून, उरूस काळात भाविकांच्या सुरक्षिततेसह आवश्यक सोयीसुविधा सुनिश्चित करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
मुस्लिम ऑल बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशन इंडिया, शाखा धाराशिव चे जिल्हाध्यक्ष शेख अ. जब्बार अ. सत्तार यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी धाराशिव यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे.
निवेदनात उरूस काळात सुरक्षा, व्यवस्था, विद्युत पुरवठा, रहदारी नियंत्रण, दरनियंत्रण तसेच मनोरंजनाच्या साधनांची सुरक्षितता याबाबत कठोर नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. उरूस काळात लागणाऱ्या विविध सेवांसाठी निविदा प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी, जेणेकरून भ्रष्टाचाराला आळा बसेल व भाविकांना दर्जेदार सेवा मिळतील, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच हॉटेल, कटलरी दुकाने, झुले, पाळणे व इतर मनोरंजनात्मक घटकांमध्ये अवाजवी दर आकारले जाऊ नयेत, यासाठी दरनियंत्रण आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे.
मागील वर्षी घडलेल्या दुर्घटनांचा संदर्भ देत, झुले, शो-लँड व पाळण्यांची सखोल सुरक्षितता तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. उरूस काळात अखंडित विद्युत पुरवठा ठेवणे व मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीमुळे रहदारी नियंत्रणासाठी योग्य नियोजन करण्यावरही भर देण्यात आला आहे. दर्गा परिसरातून जाणाऱ्या राज्यमार्ग क्रमांक २०३ वर दरवर्षी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असल्याने नागरिक व भाविकांना अडचणी येतात. त्यामुळे यंदाच्या उरूसमध्ये अतिक्रमणमुक्त व्यवस्था ठेवावी, तसेच मांढरादेवी यात्रेत घडलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी त्या धर्तीवरील सुरक्षा उपायांची तंतोतंत अंमलबजावणी करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने भाविकांच्या हिताला प्राधान्य देत योग्य निर्णय घ्यावेत व सुरक्षित, सुलभ वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.











