धाराशिव – धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून त्या आधीच जिल्ह्याच्या राजकारणात एक ज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे यंदाही घराणेशाहीचं राजकारण चालणार का? मागील अनेक वर्षांपासून धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता काही ठराविक घराण्यांच्या भोवतीच फिरताना दिसली आहे. लोकसभा, विधानसभा तसेच जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एकाच कुटुंबातील दोन-तीन चेहरे वेगवेगळ्या पदांवर दिसतात. यंदाच्या निवडणुकीतही हेच चित्र कायम राहणार का? अशी संतप्त चर्चा सर्वसामान्य मतदारांमध्ये सुरू आहे. राजकीय वर्तुळातील माहितीनुसार काही पुढारी स्वतःऐवजी आपले जोडीदार, मुले, पुतणे, सुना किंवा जवळचे नातेवाईक रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत. म्हणजेच सत्ता बदलणार, पण घराणे मात्र तेच राहणार? असा हा राजकीय डाव असल्याची चर्चा होत आहे.
तरुण कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. अनेक नवखे, मेहनती कार्यकर्ते वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करतात पण उमेदवारी मात्र ठराविक “राजकीय घराण्यां” पुरती मर्यादित राहते. दुसरीकडे, काही नेत्यांचे समर्थक घराणेशाहीचे समर्थन करत म्हणतात की, “राजकीय वारसदारांना प्रशासनाचा अनुभव जास्त असतो.” मात्र, सामान्य मतदार हा युक्तिवाद मानायला तयार नाही. “आम्हाला काम करणारा उमेदवार हवा, घराण्याचा शिक्का नाही,” अशी स्पष्ट भूमिका मतदार घेताना दिसत आहेत. एकूणच, धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक यंदा केवळ सत्तेची लढाई नसून घराणेशाही विरुद्ध सर्वसामान्य कार्यकर्ता अशी वैचारिक लढाई ठरण्याची शक्यता आहे. आता प्रश्न इतकाच आहे की, मतदार पुन्हा घराणेशाहीवर शिक्कामोर्तब करणार की बदलाचा कौल देणार?











