धाराशिव – धाराशिव जिल्हा परिषदेच्या बेंबळी गटात महायुतीच्या जागावाटपामुळे मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. भाजपचे तब्बल ४० वर्षांचे एकनिष्ठ नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास अण्णा कोळगे यांना यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
महायुतीच्या अंतर्गत समन्वयाच्या नावाखाली करण्यात आलेल्या जागावाटपात भाजपच्या निष्ठावंत नेत्यावर अन्याय झाल्याची भावना स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आहे. विशेष म्हणजे रामदास कोळगे यांनी पक्षासाठी चार दशकांहून अधिक काळ काम केले असूनही त्यांना डावलण्यात आल्याने “निष्ठेला किंमत उरली आहे का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर “आता लढायचं आणि जिंकायचंच” अशी पोस्ट व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही पोस्ट रामदास कोळगे यांच्या समर्थकांकडून असल्याचे बोलले जात असून, यामुळे कोळगे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
जर रामदास कोळगे अपक्ष निवडणूक रिंगणात उतरले, तर याचा थेट फटका महायुतीला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीतील घटक पक्षांची मतांची गणिते बिघडू शकतात. बेंबळी गटात कोळगे यांचा मजबूत जनसंपर्क आणि वैयक्तिक प्रभाव लक्षात घेता ही निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
सध्या बेंबळी जिल्हा परिषद गटात ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ पाहायला मिळत असून, रामदास कोळगे पुढील भूमिका काय घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अपक्ष लढत होणार की महायुतीत तोडगा निघणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.











