धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेत मोठा संघटनात्मक फेरबदल करण्यात आला असून जिल्हाध्यक्ष सुरज साळुंखे यांच्याकडून पदभार काढून घेत कळंब येथील अजित पिंगळे यांची एका वर्षासाठी प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली असून ही निवड शिवसेनेसाठी फायदेशीर ठरणार की अडचणी वाढवणारी, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
अजित पिंगळे यांच्या नियुक्तीने कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे संघटनात्मक अनुभव आणि कळंब परिसरातील प्रभाव लक्षात घेता ही निवड पक्षबांधणीसाठी उपयुक्त ठरेल, असा दावा समर्थकांकडून केला जात आहे. मात्र दुसरीकडे, जिल्हा परिषद निवडणुकांच्या काळात शिवसेनेचे एबी फॉर्म चुकीच्या पद्धतीने वाटप केल्याचे गंभीर आरोप अजित पिंगळे यांच्यावर झाले होते. विशेष म्हणजे या आरोपांना खुद्द धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांसमोर दुजोरा दिला होता. एवढेच की काय त्यात भर म्हणून शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांच्या निवासस्थानी सरनाईक यांच्यासमोरच शिवसैनिकांमध्ये जोरदार राडा झाला होता. यामध्ये देखील अजित पिंगळे आणि काही पदाधिकारी तसेच शिवसैनिकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पहायला मिळालं होतं. अशातच आता ज्यांच्यावर शिवसेना पक्षाचे एबी फॉर्म प्रकरणात आरोप झाले, त्याच व्यक्तीला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य आणि नाराजी व्यक्त केली जात आहे.
काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, अशा पार्श्वभूमीवर ही नियुक्ती केल्यास पक्षाची प्रतिमा धोक्यात येऊ शकते आणि त्याचा थेट परिणाम पक्षावर होऊन पक्षाला मोठा फटका देखील बसू शकतो दरम्यान, शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून मात्र ही नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपाची असून संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीनेच करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. येत्या एक वर्षात अजित पिंगळे संघटनात्मक कामगिरीतून स्वतःवर झालेल्या आरोपांचे खंडन करतील आणि कार्यकर्त्यांचा विश्वास पुन्हा मिळवतील, अशी अपेक्षा नेतृत्वाकडून व्यक्त होत आहे.
एकूणच, धाराशिव शिवसेनेतील हा फेरबदल पक्षासाठी संधी ठरणार की नवा वाद निर्माण करणारा निर्णय ठरणार, हे येणाऱ्या काळातील संघटनात्मक कामकाजावर स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत मात्र अजित पिंगळे यांची नियुक्ती हा जिल्ह्यातील राजकारणातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरणार हे मात्र नक्की











