धाराशिव – उस्मानाबाद-कळंब मतदारसंघातील महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला असून भाजपाचे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांना शिवसेनेकडून (शिंदे गट) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाचे कैलास पाटील यांच्याविरुद्ध शिंदे गटाचे अजित पिंगळे यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. दरम्यान शिवसेनेत बंडखोरीचे संकेत मिळत असून विधानसभेसाठी इच्छुक असलेले विद्यमान जिल्हाप्रमुख सुरज साळुंके हे मंगळवारी (दि.२९) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अजित पिंगळे यांना उमेदवारी देण्यात आल्याने इच्छुकांसह शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे साळुंके यांच्या बंडखोरीचा पिंगळे यांना मोठा फटका बसू शकतो.
उस्मानाबाद-कळंब मतदार संघातील महायुतीचा उमेदवार कोण असणार हा पेच अनेक दिवसांपासून सुरू होता. अनेकांची नावे समोर येत होती. उमेदवारीसाठी इच्छुकांनी वर्षा बंगल्यावर ठाण मांडले होते. मात्र इच्छुकांना मोठा धक्का बसला असून शिवसेनेकडून (शिंदे गट) भाजपाचे तालुकाध्यक्ष तथा जुने शिवसैनिक अजित पिंगळे यांना ऐनवेळी उमेदवारी घोषित केली. पक्षातील इच्छुकांचा विचार न करता भाजपात कार्यरत असलेले पिंगळे यांना उमेदवारी देण्यात आल्याने शिवसैनिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे शिवसेनेत बंडखोरी उफाळून येण्याची दाट शक्यता असून पहिली ठिणगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या माध्यमातून पडणार आहे.
अधिक अपडेट्ससाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा
सुरज साळुंके हे मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच आपण उमेदवारी अर्ज मागे न घेता निवडणूक लढविणार असल्याचा ठाम निर्धार त्यांनी केला आहे. त्यामुळे साळुंके यांची बंडखोरी महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांची डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे इतर इच्छुकांच्या भूमिकेकडे लक्ष वेधले असून कोण कोण बंडखोरी करणार? हे पाहावे लागणार आहे