धाराशिव – गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांचे वर्चस्व वाढू नये यासाठी जिल्हा भरातील अनेक शक्ती एकत्र येत प्रवीण स्वामी सारख्या नवख्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले आहे. या घडामोडी मागे वेगवेगळ्या पक्षाच्या अनेक लोकांचे वेगवेगळे मनसुभे असले तरी राज्यात महायुतीचे सरकार आल्याने या मंडळींचे स्वप्न भंगले. राज्यात जरी सत्ता नसली तरी आमदार प्रवीण स्वामी हे एक आमदार म्हणून प्रशासनाकडून शासनाच्या लोकहिताच्या योजना राबवून घेण्यात अयशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे. याचेच उदाहरण म्हणजे धाराशिव जिल्हाभरासह उमरगा व लोहारा तालुक्यात अतिवृष्टी होऊन शेती, जनावरे, घरे व दुकाने यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे आमदार म्हणून प्रशासनाला सोबत घेवून पाहणी करत त्या नागरिकांना मानसिक आधार देत तातडीची मदत मिळवून देण्याचा दिलासा देणे अपेक्षित असताना त्यांनी फक्त मतदारसंघातील काही मोजक्या भागांत जावून फोटोशेषन पुरता दौरा केला आहे. प्रशासनावर त्यांची पकड नसल्याने किंवा त्यांना त्यांच्या अधिकार व कर्तव्य याची संपूर्ण माहिती नसल्याने पाहणी दौरा दरम्यान बहुतांश वेळा एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित न्हवते. परंतु सत्ताधारी पक्षाच्या एका गटाच्या नेत्यांसमवेत महसूल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी प्रत्येक ठिकाणी उपस्थित असल्याचे दिसून आले. त्यासोबतच आमदारांकडून प्रत्येक आपत्तीग्रस्त लाभार्थ्यांना तात्पुरत्या स्वरुपाची वयैक्तिक मदत तर सोडाच शासकीय मदत वेळेत मिळवून देण्यातही ते अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. यामुळे सद्या ते नामधारी व केवळ फोटोशेषनचे आमदार असल्याची नागरिकांमध्ये उघड चर्चा सुरु आहे.
लाचार महसूल प्रशासन?
काही दिवसांपूर्वी उमरगा तालुक्यातील सत्ताधारी पक्षाच्या एका गटाने महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा शेतकरी मेळावा मुरूम येथे आयोजित केला होता. यावेळी बहुधा मा.महसूल मंत्री यांनी तालुक्यात कोणत्या गटाच्या नेते किंवा कार्यकर्ते यांच्या प्रभावाखाली काम करावे असा कानमंत्र दिला असेल याचाच परिणाम म्हणून उमरगा तालूक्यात अतिवृष्टी काळात पडझड झालेल्या मालमत्तेची नुक्सान भरपाई म्हणून शासनाद्वारे दिली जाणारी आर्थिक मदत महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्ताधारी पक्षाच्या एका गटाच्या युवा नेत्याच्या हस्ते वाटप करण्यात आले. याचा तात्पर्य म्हणजे आमदार महोदय हे फक्त नामधारी झालेत किंवा भाजपच्या सत्ताधारी गटाकडून त्यांना नेहमी सहकार्य मिळत असल्याने ते या प्रकरणात मुग गिळून गप्प बसले आहेत हे विशेष. महसूल मंत्र्यांच्या दौऱ्यानंतर महसूल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी हे प्रत्येक शासकीय कार्यक्रम, पाहणी दौरे आदी विविध कार्यक्रम सत्ताधारी पक्षाच्या या गटाच्या उपस्थितीत पार पाडत आहेत. हि बाब महसूल प्रशासनाची लाचारी असल्याचे सर्वसामान्य लोकांमध्ये बोलले जात आहे.











