व्हायरल झालेल्या पत्राची तक्रार देणार का? आमदार प्रविण स्वामी यांची हातची घडी तोंडावर बोट
धाराशिव – उमरगा – लोहारा मतदार संघांचे ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी पुन्हा एकदा नवीन वादात अडकले आहेत. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासकीय मदतीचे वितरण करण्यासाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला आमदार स्वामी यांना बोलावण्यात आले नसल्याने वाद सुरु झाला. राजशिष्टाचाराचा भंग केल्या प्रकरणी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्यावर सात दिवसांच्या आत निलंबनाची कारवाई करावी अन्यथा त्या कार्यक्रमाला आपली मूक संमती होती असे मानून जिल्हाधिकारी यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात येईल असा इशारा स्वामी यांनी पत्राद्वारे दिला होता.
पहिल्या पत्रात खासदार ओमराजे यांचाच मजकूर?
प्रवीण स्वामी यांच्या पहिल्या पत्रात लोकसभेत हक्कभंग आणू असा उल्लेख होता, स्वामी हे महाराष्ट्र विधानसभेतील आमदार मग ते लोकसभेत हक्कभंग कसा आणणार? पत्र वाचून अनेकांना हा गमतीशीर प्रश्न उपस्थित झाला होता. राजशिष्टाचारनुसार मला व आमदार प्रवीण स्वामी यांना कोणतीही पुर्व कल्पना न देता खासगी ठिकाणी मदत वाटप करण्यात आले असे त्या पत्रात नमुद आहे. मात्र, स्वामी यांनी स्वतः पत्र दिले आहे तर त्या पत्रामध्ये मला व आमदार प्रवीण स्वामी यांना असा उल्लेख केल्याने पत्र वाचणाऱ्यांना डोके खाजवत विचार करण्याची वेळ स्वामींनी आणली. या प्रकरणाची 2 वेगवेगळी पत्र समोर आली आहेत. विशेष म्हणजे त्या दोन्ही पत्रांमध्ये आमदार महोदयांची सही वेगळी आहे तर मजकूर सारखाच आहे.

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी याच विषयाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांना जे पत्र दिले आहे त्यातील व आमदार प्रवीण स्वामी यांनी दिलेल्या पत्रातील मजकूर हा जवळपास सारखाच आहे. त्यामुळे हा निव्वळ योगायोग समजावा का? आमदार स्वामी यांचे सुरुवातीला जे पत्र व्हायरल झाले त्यावरील व नंतर दिलेल्या दुसऱ्या पत्रावरील स्वामी यांची सही ही वेगवेगळी आहे, त्यातील फरक स्पष्ट दिसतो. आमदार प्रवीण स्वामी यांचे पत्र परस्पर कोणी टाईप केले? त्यावर खोटी सही कोणी केली? याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. गंभीर प्रकरणाबाबत आमदार प्रवीण चौकशीची मागणी करतील का हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत स्वामी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन न उचलत “हाताची घडी, तोंडावर बोट” ठेवण्याचे पसंत केले.











