अर्चना पाटील या निवडणुकीतून माघार घेणार असल्याची चर्चा ठरली “बोभाटा”
धाराशिव – धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस अत्यंत निर्णायक ठरला. या शेवटच्या टप्प्यात भाजपच्या अर्चना पाटील आणि बंडखोर नेते धनंजय सावंत यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे अधिकच तापली आहेत.
भाजपच्या अर्चना पाटील यांनी केशेगाव गटातून आपला उमेदवारी अर्ज माघारी घेत तेर जिल्हा परिषद गटातून उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे तेर गटातील लढत आता अधिक लक्षवेधी बनली आहे. अर्चना पाटील या निवडणुकीतून माघार घेणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगत होत्या. मात्र त्या चर्चा केवळ बोभाटा ठरल्या असून अर्चना पाटील पूर्ण ताकदीने रिंगणात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, माजी मंत्री व आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात बंड पुकारलेल्या धनंजय सावंत यांनीही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी डोंजा गटातील उमेदवारी अर्ज माघारी घेऊन जवळा गटातून उमेदवारी कायम ठेवली आहे. या निर्णयामुळे जवळा गटातील लढत अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
विशेष म्हणजे, धनंजय सावंत यांची उमेदवारी ही केवळ स्थानिक निवडणूक न राहता ती आता सावंत घराण्यातील राजकीय संघर्षाचे प्रतीक मानली जात आहे. त्यामुळे या लढतीकडे केवळ जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. एकीकडे भाजपच्या अर्चना पाटील यांची तेर गटातील ठाम भूमिका, तर दुसरीकडे काकांच्या विरोधात उघड बंड पुकारून निवडणूक लढवणारे धनंजय सावंत या दोन्ही लढतींमुळे धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक राजकीय शक्तिप्रदर्शनाची रंगभूमी ठरण्याची शक्यता आहे. आता उमेदवारी अर्ज माघारीचा टप्पा पूर्ण झाल्याने प्रचाराचा धडाका सुरू होणार असून, येत्या काही दिवसांत आरोप–प्रत्यारोप, सभा–बैठका आणि राजकीय हालचालींना वेग येणार आहे. त्यामुळे तेर आणि जवळा गटातील या दोन लढती निकालाच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.











