कोणाची कोणासोबत युती, कोणासोबत आघाडी? लवकरच चित्र होणार स्पष्ट
धाराशिव – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होताच धाराशिव जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. पुढील दोन दिवसांत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी युती व आघाडी संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोणता पक्ष कोणासोबत युती करणार आणि कोणासोबत आघाडी करणार, याचे चित्र देखील लवकरच स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.
राजकीय हालचालींना वेग
गेल्या काही दिवसांपासून भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) तसेच काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) या पक्षांमधील इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. तसेच जिल्ह्यातील मुख्य नेत्यांच्या देखील पडद्यामागे चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील प्रमुख मुंबई, पुणे येथे महापालिका निवडणुकीमध्ये व्यस्त असल्याने त्या ठिकाणच्या निवडणुकी नंतर बैठकांचे सत्र सुरू होणार असल्याचे समजते. त्यामुळे येत्या दोन दिवसांत निर्णायक बैठका होण्याची शक्यता आहे.
युतीचे गणित कसे असेल?
सध्यातरी उघडपणे कोणत्याही पुढाऱ्याने युती-आघाडी बाबत उघडपणे वक्तव्य केले नसले तरी दबक्या आवाजामध्ये युती व आघाडीची चर्चा सुरू असून नगरपालिकेतील निवडणूकीचा पॅटर्न बघायला मिळतो की काही वेगळे धक्कातंत्र वापरून राजकीय समीकरणे जुळवली जातील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
तानाजी सावंत यांनी दिले वेगळ्या राजकीय समीकरणाचे संकेत?
माजी आरोग्य राज्य मंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांनी भाजपवर आग पाखड करत कार्यकर्ता बैठकी मेळाव्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना जिल्ह्यात आगामी निवडणुकांसाठी आपल्या पक्षाकडून सर्वांसाठी चर्चेची दारे खुले असल्याचे स्पष्ट बोलून दाखवले होते. त्यामुळे शिवसेना (शिंदे) व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दोन्ही शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. जर दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर दुसरीकडे भाजप हा स्वतंत्र किंवा दोन्ही राष्ट्रवादींना सोबत घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरेल का? असे देखील बोलले जात आहे. त्यामुळे धाराशिव जिल्हा परिषदेची निवडणूक ही वेगळ्या राजकीय समीकरणांवर व प्रतिष्ठेची होणार हे मात्र नक्की.











