धाराशिव – धाराशिव मध्ये नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली असून उमेदवारांनी आपापल्या प्रभागातून प्रचाराला सुरुवात देखील केली आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नगराध्यक्षा पदासाठी अर्ज केलेल्या एकूण 7 उमेदवारांनी आपला अर्ज माघारी घेतला आहे. तर नगरसेवक पदासाठी अर्ज केलेल्या 55 जणांनी अर्ज माघारी घेतला आहे. दरम्यान यावेळीच शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत शिवसेना पक्ष स्वतंत्र भूमिका घेणार असल्याचे जाहीर केले. राणाजगजितसिंह पाटील यांनी आमचा विश्वासघात करत पाठीत खंजीर खुपसला असे म्हणत साळुंखे यांनी राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर तोफ डागली. निवडणुकीतील युतीबाबत सविस्तर भूमिका सुरज साळुंके हे उद्या स्पष्ट करणार आहेत.
दरम्यान, मुंबई येथून परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक व भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिव नगरपरिषदेची निवडणूक ही महायुती मधूनच लढवणार असल्याचे दोघांनी जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात धाराशिव मध्ये महायुती न होता शिवसेना पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचे परंडा येथील कार्यकर्ता बैठकीतून माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी जाहीर केले होते. अशातच आता धाराशिव मध्ये देखील भाजप सोबत युती न करता शिवसेना पक्ष हा स्वतंत्र वेगळी भूमिका घेणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे मंत्री प्रताप सरनाईक व आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी घोषित केलेल्या महायुतीला घरघर लागली असून भाजप व शिवसेना ही स्वतंत्र लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. मंत्री प्रताप सरनाईक हे 22 तारखेला धाराशिव दौऱ्यावर येणार असून ते नेमकी काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.











