धाराशिव – बसवराज मंगरुळे आपल्या धाराशिव जिल्ह्याला हे नाव नवखं वाटत असेल.पण धाराशिवच्याच मातीत या नावाचा जन्म झाला.येथील मातीतच पहिली पाऊलं पडली.याच मातीत शिक्षणाची आणि समाजिक जाणीवांची बीजे रोवली.या मायभूमीतूनच मोठी स्वप्न पाहत संभाजीनगरची वाट धरली.उमरगा तालुक्यातील मुरुम गावच्या शेतकऱ्याचा मुलगा भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदापर्यंत पोहोचला.तर कष्ट आणि कर्तृत्वाच्या जोरावर छत्रपती संभाजीनगरमध्ये श्रीयश प्रतिष्ठानच्या माध्यमातून शैक्षणिक संकुलही उभारलं.सामाजिक व राजकीय कर्तृत्वातून या संघर्षयोद्धाने माणसांची अफाट श्रीमंती कमावली.
उमरगा तालुक्यातील मुरुम गावच्या विश्वनाथ अप्पा मंगरुळे या शेतकरी कुटुंबात ७ सप्टेंबर १९६३ रोजी बसवराज यांचा जन्म झाला.शालेय शिक्षण गावात आणि महाविद्यालयीन शिक्षण धाराशिवला पूर्ण केल्यानंतर शासकीय इंजिनिअरींगला नंबर लागल्याने त्यांनी संभाजीनगर गाठलं.गावच्या मातीनेच नेतृत्त्वगुण अंगी भरले होते.म्हणूनच सन १९८२-८३ साली महाविद्यालयीन निवडणुकीत विजयी होत ते इंजिनिअरींग कॉलेजचे युआर बनले.तर १९८५-८६ साली विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष झाले.आपल्या अध्यक्षपदाचा उपयोग विद्यार्थ्यांसह संस्थेलाही झाला पाहिजे,याच हेतुने त्यांनी १९८५-८६ साली महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमास राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासह कॅबिनेट मंत्र्यांनाही निमंत्रित केलं होतं.त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री आणि दिग्गज उपस्थित राहिले.विशेष म्हणजे याच कार्यक्रमातून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे कॉम्प्युटर सायन्स व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेश ब्रांच संभाजीनगरमध्ये सुरू करण्याची मागणी केली.तसेच मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहही मागितले.केवळ मागणीवर न थांबता या मागणीचा पाठपुरावा करत दोन्हींसाठी तात्काळ मंजुरीही मिळवली.महाविद्यालयीन जीवनातच नेतृत्वगुणाची चुणूक दाखवल्याने पुढे सक्रीय राजकारणात हाच गुण सद्गुण ठरला.छात्रसंघाच्या निवडणुकांपासून सुरु झालेला प्रवास लवकरच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचला.संभाजीनगरमधून मराठवाड्यातील भाजप कार्यकर्ता बनून पक्षाच्या प्रत्येक कार्यात त्यांनी हिरिरीने सहभाग नोंदवला.दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडें साहेबांसोबत ते पक्षाचं काम करु लागले.
“मुंडें साहेब त्यांच्या पाठिशी आहेत,असं मराठवाड्यात बोललं जायचं.पण,मी बसवराजच्या पाठीशी नाही तर सोबत आहे. कारण,सावली कधीच साथ सोडत नाही असे मुंडेंसाहेब म्हणायचे.
संभाजीनगर भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही मंगरुळे यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.मोर्चे,आंदोलने,सामाजिक उपक्रम,वरिष्ठ नेत्यांच्या सभांचं नियोजन,पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका,लोकसभा,विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही त्यांनी भरीव योगदान दिलं आहे.विशेष म्हणजे धनंजय मुंडेंविरुद्ध विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपच्यावतीने त्यांना उमेदवारी देण्यात आली होती.पण पक्षाच्या निर्देशाचं पालन करत त्यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला.संभाजीनगरमध्ये भाजपला प्रतिकूल परिस्थिती नसतानाही महापालिकेत प्रथमच १८ जागांवर उमेदवार निवडून आणण्याची किमया त्यांच्याच अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत भाजपने साधली.संभाजीनगरमध्ये सामाजिक कार्यातील त्यांचा वेगळेपणाही सर्वपरिचीत आहे.जनसेवा हीच ईश्वरसेवा हा सुविचार त्यांनी कृतीत उतरवला.सन २०१८ पासून फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन संभाजीनगरमध्ये केलं.त्यातून हजारो गरजू रुग्णांचे मोफत रोगनिदान व उपचार झाले.कोरोनाच्या महामारीतही त्यांचा संवेदनशीलपणा सर्वांनी पाहिला.याकाळी आशा वर्कर व कामगार वर्गातील ३५०० कुटुंबांना काही महिने पुरेल एवढे अन्नधान्याचे कीट त्यांनी पुरवले.नोकरी देणारा नेता म्हणून तरुणाई त्यांच्याकडे आशेनं पाहू लागली.सन २०११ पासून संभाजीनगरमध्ये ते दरवर्षी रोजगार मेळाव्याचं आयोजन करतात.पहिल्याच वर्षी ४०० तरुणांना येथून नोकरी मिळाली आहे.हा रोजगार मेळावा आजतागायत अविरतपणे सुरु आहे.
साहेबांचं वृक्षप्रेम आणि पर्यावरणवादी विचारही समाजाला दृष्टी देणारा आहे.फडणवीस साहेबांच्या प्रेरणेतून आणि तत्कालीन पर्यावरणमंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून संभाजीनगर येथे पहिली वृक्षदिंडी काढण्याचं काम मंगरूळे साहेबांनीच केलं.तर संभाजीनगरमध्ये आत्तापर्यंत ३५ हजार झाडांची लागवड अन् संवर्धनाचं कार्यही पूर्णत्वाला नेलंय.यासोबतच,पाणी अडवा-पाणी जिरवा हे काम कृतीतून दाखवून दिलंय.आधी स्वत:च्या संस्थेतून त्याची सुरुवात केली अन् मग जनजागृतीची मोहिमही राबवली.
मंगरुळे साहेबांचे सर्वपक्षीय सौहार्दाचे संबंध आहेतच,त्याहीपलिकडे लिंगायत समाजाच्या धर्मगुरुंसोबतही त्यांनी आपुलकीचे अन् सौहार्दाचं नातं जपलंय.लिंगायत समाजाच्या संघटनांकडूनही अनेकदा त्यांचा सन्मान झाला आहे.साहेबांच्या कामाची हीच पद्धत त्यांचा अवाका वाढवण्यात अन् सर्वत्र सलोख्याचे संबंध निर्माण करण्यात लक्षणीय ठरलीय.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि केंद्रीयमंत्री अमित भाई शहा यांनी कलम ३७० हटवल्यानंतर संपूर्ण मराठावाडा फिरुन त्यांनी या निर्णयाची जनजागृती केली.तत्पूर्वी अहमदाबाद येथील आयोजित प्रशिक्षण शिबिरात त्यांचा सहभाग राहिला होता.धाराशिव,संभाजीनगर,बीडसह मराठवाड्यात सातत्याने कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवत त्यांनी आपली नाळ घट्ट केली.पक्षासाठी केलेल्या कार्याची दखल घेत २०२० मध्ये वरिष्ठ नेते देवेंद्रजी फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांना भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली.कधीकाळी मुरूमसारख्या लहानशा खेड्यातून शिक्षणासाठी संभाजीनगरला आलेला युवक तेव्हा देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या राज्याचा उपाध्यक्ष बनला.ही गोष्ट धाराशिवसाठी जेवढी अभिमानास्पद तेवढीच प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी होती.शिक्षण क्षेत्रात भरिव काम असल्याने साहेबांनी शिक्षण संस्था उभारण्याचं स्वप्न पाहिलं.सामाजिक कार्यासाठी सुरू केलेल्या श्रीयश प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे स्वप्न सत्यातही उतरलं.सन २००७ साली त्यांनी इंजिनिअरींग,फार्मसी,एमबीए कॉलेजच्या माध्यमातून श्रीयश शिक्षण संकुल उभारलं.दर्जेदार शिक्षण आणि गुणवंत विद्यार्थी घडवणारं हे महाविद्यालय आहे.आपलं कॉलेज डिग्री देणारं केंद्र बनू नये तर ज्ञान देणारं संकुल असावं असं ते म्हणतात.म्हणूनच नॅक मानांकन मिळवणारं श्रीयश अभियांत्रिकी महाविद्यालय मराठवाड्यातील पहिलं कॉलेज आहे.विशेष म्हणजे विद्यापीठाच्या निर्णय प्रक्रियेतही आपण असलं पाहिजे असं त्यांनी ठरवलं.त्यातूनच नोव्हेंबर २०२२ मध्ये संस्थाचालक गटातून ते सिनेट सदस्य म्हणून सर्वाधिक मतांनी विजयी झाले.तर फेब्रुवारी २०२३ मध्ये संस्थाचालक गटातून व्यवस्थापन परिषदेवर विक्रमी मतांनी निवडून आले.
संवेदनशील मनाचा कर्तृत्ववान कार्यकर्ता,शिक्षण संस्थापक,उद्योजक राजकारणी आणि खिलाडू वृत्तीचा नेता म्हणून बसवराज मंगरुळे साहेबांची महाराष्ट्राला ओळख आहे.कर्मभूमीने खूप काही दिलंय,आता जन्मभूमीसाठी काहीतरी करायचंय हाच सेवाधर्म मनी बाळगून ते आपल्या मुरूम गावी स्थायिक झाले आहेत.अनुभवाच्या,जनसंपर्काच्या,पदाच्या आणि भाजपामधील योगदानाच्या जोरावर आता ”धाराशिव नवपर्वारंभाचे” स्वप्न त्यांनी बाळगलंय.तेच स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी हा माणूस झपाटून कामाला लागला लागलाय,दिवसरात्र एक करत जनसेवेत उतरलाय, समाजकार्यात स्वत:ला झोकून देत धाराशिवकरांचा बनलाय,गावागावातून लोकांचा प्रतिसाद त्यांना मिळतोय,त्याच प्रतिसादाच्या जोरावर धाराशिवचा चेहरा-मोहरा बदलायचा वसाच त्यांनी घेतला आहे.सर्वसामान्य लोकांच्या जीवनात आर्थिक उत्कर्ष आणण्यासाठी जिल्ह्यातील ज्या त्या भागातील बलस्थाने ओळखून त्या त्या भागाशी निगडित उद्योग व्यावसायाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्याचं स्वप्न उराशी बाळगून असलेल्या बसवराज मंगरुळे यांच्याकडे विकासाचं व्हिजन असलेला नेता म्हणून पाहणे वावगे होणार नाही ….!