ज्वारी पिकासाठी 30 नोव्हेंबर, गहू बागायत,हरभरा व रब्बी कांदा या पिकासाठी 15 डिसेंबर तर उन्हाळी भुईमूग या पिकासाठी 31 मार्च 2024 पर्यंत मुदत
धाराशिव – रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्ती,कीड व रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत शेतकरी नोंदणीसाठी राष्ट्रीय विमा संकेतस्थळ कार्यान्वित करण्याचे शासनाने निर्देश आहे.चालू रब्बी हंगामात कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पिकविम्याचा हप्ता भरण्याची अंतिम मुदत रब्बी ज्वारी बागायत व रब्बी ज्वारी जिरायत पिकासाठी 30 नोव्हेंबर 2023,गहू बागायत,हरभरा व रब्बी कांदा या पिकासाठी 15 डिसेंबर 2023 तर उन्हाळी भुईमूग या पिकासाठी 31 मार्च 2024 ही आहे.पिकविमा योजना ही कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घ्यावयाचा नसेल तर कर्ज घेतलेल्या अधिसुचित पिकांकरीता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधीपर्यंत संबंधित बँकेस विमाहप्ता कपात न करण्याबाबत घोषणापत्र देणे आवश्यक आहे.
जे कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होण्याबाबत घोषणापत्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल.या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा रब्बी हंगामासाठी 1.50 टक्के व नगदी पिकासाठी 5 टक्के असा मर्यादीत ठेवण्यात आला असला तरी सन 2023-24 पासून सर्वसमावेशक
पिकविमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी प्रती अर्ज केवळ 1 रुपया भरुन पिकविमा पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे.तर शेतकरी हिस्यातील उर्वरीत पिकविमा हप्त्याची रक्कम राज्य शासन भरणार आहे.
शेतकऱ्यांना ज्या पिकाचा विमा उतरावयाचा आहे ते पीक शेतात पेरल्याबद्दलचे स्वयंघोषणापत्र, सात-बारा उतारा,आधार कार्ड व बँक पासबुकच्या झेरॉक्स प्रतीसह नजीकच्या बँकेत अथवा आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्ता भरुन पीक संरक्षित करावे.
तरी पिकविमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा. तसेच शेतकऱ्यांनी अधिक माहीतीसाठी PMFBY.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा किंवा नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे.