हायवेवर वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यास पोलीस प्रशासन अयशस्वी
वाशी – तेरखेड्या नजीक धावत्या मिनीबस वर चढूत प्रवाशांच्या बॅगेतील सोने व रोख रक्कम चोरल्याची घटना घडली आहे.
गेवराई तालुक्यातील वडगाव येथील आवटे सच्चिदानंद हे त्यांच्या मिनी बस मध्ये प्रवासी भरुन अक्कलकोट वरून बीडकडे जात आसताना 13 डिसेंबर रोजी रात्री 8 ते 8.30 वाजण्याच्या सुमारास तेरखेडा येथील आरुष बिअरबार ते तेरखेडा पासून अंदाजे 2 किलो मिटर अंतरावर असलेल्या पेट्रोलपंपाच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने मिनी बसच्या टपावर चढून 8 प्रवासी बॅगेमधील 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 50,000 रू तसेच कपडे असा एकुण अंदाजे 89,000 रुपये किमतीचा माल चोरल्याची घटना घडली आहे. सच्चिदानंद आवटे यांनी 30 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पोलीस ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान,चालत्या वाहनावर चढून चोरी करण्याचा प्रकार हा काही नवीन नाही.ह्या आधी देखील तेरखेडा ते पार्डी फाटा ह्या ठिकाणी अनेक प्रवास्यांच्या बॅगेतील ऐवज तसेच वाहनातील कपडे, किराणा तसेच इतर माल चोरीच्या घटना सातत्याने होत आहेत. कधी-कधी तर प्रवाशांना किंवा वाहनधारकांना चोरी झाल्यास फिर्याद नोंदवण्यासाठी येरमाळा किंवा वाशी पोलीस स्टेशनमध्ये हेलपाटे मारावे लागत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. हायवेवरील चोरींच्या घटना रोखण्यासाठी व चोऱ्यांचा तपास लावण्यासाठी पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.